मंचर प्रतिनिधी:-
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे खेड तालुक्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग भीमाशंकर अभयारण्यात असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे दर्शनासाठी बाराही महिने भाविकांची गर्दी असते
पण गेल्या काही वर्षांत भिमाशंकर देवस्थान अनेक कारणांमुळे चर्चेत आले सोयीसुविधांचा अभावामुळे तिथे येणारे पर्यटक परत येण्याची इच्छा होणार नाही असे सांगतात.
वास्तविक शासनाने तिथे चांगले रस्ते, वाहन तळ, जागोजागी पाणपोई, आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. या मुलभूत सुविधा झाल्या तर तिथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून शासनाला चांगला महसूल आणि स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. परंतु शासनाच्या उदासीन कारभारामुळे येणाऱ्या पर्यटकांना अतोनात हाल सोसावे लागतात.
तिथे उदभवणाऱ्या परिस्थिती ला कित्येकदा पर्यटक ही जबाबदार असल्याचे दिसून येते एकपदरी रस्त्यावर बेशिस्त पणे दुतर्फा वाहने पार्क करणे असो किंवा जंगल परिसरात सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य असो याला स्थानिक लोक, प्रशासनासोबत पर्यटक ही तितकेच जबाबदार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून मंदिर परिसरात सगळीकडे विकासाच्या नावाखाली अनेक कामं सुरू आहेत. त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य आणि पर्यटकांनी केलेला कचरा जागोजागी मोठ्या प्रमाणात दिसून येतो. शिवाय जंगल परिसरात बेकायदा बांधकामांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे पावसाळ्यात भुस्खलन होऊन माळीण सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असूनही मुलभूत सुविधांचा अभाव स्थानिक नेत्यांचे राजकारण आणि पुजा अर्चा करण्यावरून झालेली भांडणे यामुळे कुठेतरी भिमाशंकर देवस्थानचा कारभार चव्हाट्यावर येऊन जगभरात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. तरीदेखील सरकारला कोणतेही गांभीर्य नाही. अनेकदा भाविकांनी पर्यटकांनी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या पण कुंभकर्णी झोपेचं सोंग घेतलेल्या सरकार आणि प्रशासनाला काहीही सोयरसुतक नाही असेच दिसून येते.