पिंपरी प्रतिनिधी:-
चिखली येथे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरूत्थान अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने राबवलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) घरकुल योजनेतील ३६.७७ चौ. मी. (३९५.६५ चौ.फूट) असलेल्या गरिबांच्या घरांसाठी महानगरपालिकेची कर आकारणी (घरपट्टी) रद्द करावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘जेएनएनयुआरएम’ या योजनेंतर्गत चिखली येथे शहर परिसरात वास्तव्य करीत असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी गृहयोजना प्रकल्प उभारण्यात आला आहे. सदर ठिकाणी १६० इमारती असून, एकूण ६ हजार ७२० कुटुंबांना येथे निवारा मिळाला आहे.
या घरकूलमध्ये राहत असलेली सर्व कुटुंबे ही आर्थिक दुर्बल घटकातून आलेली असल्याने रोजंदारीवर काम करुन पोट भरणारा जनसमुदाय येथे वास्तव्यास आहे. या सर्वांचे जीवनमान हे अत्यंत दुबळे व दारिद्र पद्धतीचे आहे. ही सर्व कुटुंबे शहरातील कोणत्या ना कोणत्या झोपडपट्टी भागात राहणारी आहेत. तसेच, मुलांचे शिक्षण, घराचे बँकेचे हप्ते यामुळे सदर कुटुंबियांची परिस्थिती नाजूक आहे.
वास्तविक, मुंबई महापालिका अधिनियम कलम १४० मधील उप कलम (१) नुसार निवासी इमारती किंवा निवासी सदनिका चटई क्षेत्र ४६.४५ चौ. मीटर (५०० चौ. फूट) किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या निवासी इमारती किंवा निवासी सदनिका यांना कर आकारणी करण्यात येवू नये. या नियमानुसार, पिंपरी-चिंचवड येथील आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबियांना दिलेल्या घरकूल योजनेतील सदनिका या ३६.७७ चौ. मीटर (३९५.६५ चौ. फूट) आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही मुंबई महापालिका अधिनियम कलम १४० मधील उप कलम (१) अन्वये कर आकारणीतून कायमस्वरुपी मुक्तता मिळावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेले घरकूलमध्ये गोरगरिब- कष्टकरी नागरिक वास्तव्य करतात. मुंबई महानगरपालिका नियमानुसार, ५०० चौ.फूटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाधारकांना मिळकतकर आकारणी करीत नाही. त्याच धर्तीवर चिखली घरकुलमधील सदनिकाधारकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आकारण्यात येणारा घरपट्टी (मिळकत कर) रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यासाठी सकारात्मक भूमिकेतून पाठपुरावा करणार आहे. असे आमदार लांडगे यांनी सांगितले.




